इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन!
Dattatreya Hosabale RSS statement : "भारतीयत्व आणि हिंदुत्व ही केवळ एक ठराविक मानसिकता नसून ती एक समृद्ध जीवनशैली आहे," असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी व्यक्त केले.
हरियाणातील पानिपत येथे आयोजित 'अखिल भारतीय प्रतिनिधी सभे'च्या समारोपप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून ते संघाच्या आगामी विस्तारापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केले.

इराण-इस्रायल संघर्षावर भारताची भूमिका योग्य
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः इराणबाबत भारत सरकार जी भूमिका घेत आहे, त्याचे होसाबळे यांनी समर्थन केले. ते म्हणाले, "भारत सरकार देशाच्या हितासाठी अत्यंत योग्य पावले उचलत आहे. संघ जगात शांतता प्रस्थापित व्हावी याच मताचा आहे. शेजारील राष्ट्रांशी, मग तो बांगलादेश असो वा नेपाळ, भारताचे संबंध सलोख्याचे असणे संपूर्ण आशियाच्या विकास आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे." तथापि, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.
संघ संरचनेत बदल आणि महिलांचा सहभाग
संघातील संघटनात्मक बदलांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जबाबदारीत काही बदल झाल्यास ते अधिकृतपणे जाहीर केले जातील. तसेच, संघाच्या सर्वसमावेशकतेवर भर देताना ते म्हणाले, "भगव्या ध्वजाला वंदन करणारी कोणतीही व्यक्ती संघात येऊ शकते. संघात आधीच अनेक मुस्लिम कार्यकर्ते सक्रिय आहेत. महिला केवळ शाखेच्या कामातच नाहीत, तर संघाच्या विविध कार्यप्रणालींमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्र उभारणीत योगदान देत आहेत."
पानिपत ठरणार उत्तर भारताचे 'शक्तिपीठ'
नागपूरच्या धर्तीवर हरियाणातील पानिपत (पट्टी कल्याण) येथील 'माधव सृष्टी साधना केंद्र' विकसित करण्याची तयारी संघाने सुरू केली आहे. सुमारे २५ एकरवर पसरलेले हे केंद्र उत्तर भारतातील राज्यांसाठी एक मोठे मुख्यालय म्हणून उभे राहणार आहे. दिल्लीशी असलेली जवळीक आणि उत्तम दळणवळण यामुळे या केंद्राचे महत्त्व अधिक वाढणार आहे. येथे सध्या ग्रामीण विकास, मशरूम लागवड आणि विविध शैक्षणिक अभ्यासक्रम राबवले जात आहेत.
शताब्दी वर्षाचा आढावा आणि शाखा विस्तार
संघाच्या शताब्दी वर्षाचा (२०२५-२६) वार्षिक अहवाल यावेळी सादर करण्यात आला. आकडेवारीनुसार:
- देशभरात सध्या ८८,९४९ शाखा कार्यरत आहेत.
- गेल्या वर्षाच्या तुलनेत ५,८२० नवीन शाखांची भर पडली आहे.
- विशेषतः केरळ, तामिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये संघाचे कार्य विस्तारण्यावर भर दिला जात आहे.
सामाजिक समरसतेचा संदेश!
यावर्षी संत शिरोमणी रविदास यांची ६५० वी जयंती साजरी केली जात असून, त्याद्वारे समाजात समानतेचा संदेश दिला जात असल्याचे होसाबळे यांनी सांगितले. तसेच, भटक्या गुरांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, गाईंकडे केवळ दुधाचे साधन म्हणून न पाहता, त्यांच्या उपयुक्ततेचा विचार करून त्यांना रस्त्यावर सोडू नये.
भाजपशी संबंध : संघ विचारसरणी भाजपला मान्य असल्याने अनेक स्वयंसेवक राजकारणात सक्रिय आहेत.
यूजीसी वाद : प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तूर्तास भाष्य करण्यास नकार.
प्रतिनिधी सभा : ३२ संघटनांच्या सूचना आणि १,४८७ पदाधिकाऱ्यांचा सहभाग.












Click it and Unblock the Notifications