तहव्वुर राणाला कसाबप्रमाणे फाशी देता येणार नाही, हे आहे खास कारण
Tahawwur Rana : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वुर हुसेन राणाला विशेष विमानाने भारतात आणलं आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पण टाळण्यासाठीचा त्याचा शेवटचा प्रयत्न फेटाळून लावला. यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.
भारताने या संबंधी ठोस पुरावे दाखवले आहेत, त्या आधारावर त्याला अमेरिकेतून आणले जात आहे. मात्र, अजमल कसाबप्रमाणे राणाला फाशीची शिक्षा देणे शक्य नाही. कारण की या प्रकरणात भारताला आंतरराष्ट्रीय प्रत्यार्पण कराराचे पालन करावे लागेल. याअंतर्गत राणाला मृत्युदंडाची शिक्षा देता येत नाही किंवा त्याच्याविरुद्ध कोणताही नवीन खटला दाखल करता येत नाही.

जरी भारताने राणाविरुद्ध नवीन अनेक खटले दाखल केले असले तरीही तहव्वूर राणा याच्यावर भारतात जे आरोप आहे त्या प्रकरणीच खटला चालवता येणार आहे. कारण अमेरिकन न्यायालयासमोर लेखी स्वरूपात प्रत्यार्पणासाठी जी माहिती सादर केली गेली आहे, त्याच प्रकरणात प्रत्यार्पण करारानुसार, खटला चालवता येतो.
दरम्यान या प्रकरणात भारत प्रत्यार्पण न्यायालयासमोर उल्लेख न केलेला कोणताही नवीन कलम जोडू शकत नाही. नियमांनुसार, राणाला मुंबई हल्ल्याच्या आधारे भारतात आणण्यात आले आहे, त्यामुळे त्याच्याविरुद्ध फक्त मुंबई हल्ल्याचा खटला चालवला जाईल. जरी चौकशीदरम्यान त्याने भारतात केलेल्या इतर गुन्ह्यांची कबुली दिली तरी सुध्दया राणाला मृत्युदंडाची शिक्षा देता येत नाही.
ना जामीन ना पॅरोल, तहव्वूर राणा जेलमध्येच राहणार
या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राणाला जामीन मिळणार नाही तसेच तुरुंगातून पॅरोलही मिळणार नाही. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्याला तुरुंगातच राहावे लागेल. तसेच भारतीय न्यायालय त्याला कोणतीही शिक्षा देईल, ती त्याला तुरुंगात भोगावी लागेल पण ती मृत्युदंड शिक्षा असू शकत नाही.
दरम्यान राणाप्रमाणेच भारत सरकारने यापुर्वी कुख्यात डॉन अबू सालेमचेही प्रत्यार्पण केले होते. त्या प्रकरणातही त्याला मृत्युदंड देता येणार नाही हे स्पष्ट होते. शिवाय, त्याच्याविरुद्ध फक्त तेच खटले चालवले गेले जे भारतीय एजन्सींनी प्रत्यार्पणादरम्यान परदेशी न्यायालयाला सांगितले होते. अबू सालेम भारतात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मकोका अंतर्गत नवीन खटला दाखल केला. परंतु नंतर अबू सालेमने न्यायालयात अपील केल्यामुळे मुंबई पोलिसांना तो खटला मागे घ्यावा लागला. जर भारतीय न्यायालयाने राणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर त्याला ती शिक्षा भोगावी लागेल.












Click it and Unblock the Notifications