Maha Kumbh 2025 : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची होणार न्यायालयीन चौकशी; न्यायिक आयोगाची स्थापना
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला बुधवारी चेंगराचेंगरी झाली. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला तर ६० हून अधिक भाविक जखमी झाले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करुन ती एका महिन्यात पूर्ण करावी, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधिश हर्षकुमार यांनी ही माहिती दिली. हा आयोग आज, शुक्रवारी घटनास्थळी भेट देणार आहे.

त्रिसदस्यीय समिती स्थापन
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हर्ष कुमार या आयोगाचे प्रमुख आहेत. त्यांच्याखेरीज माजी पोलीस महासंचालक व्ही. के. गुप्ता आणि निवृत्त आयएएस अधिकारी डी. के. सिंह यांचा या पॅनेलमध्ये समावेश आहे. आयोगाने गुरुवारी कामाला सुरुवात केली. 'आयोगाकडे चौकशी पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा वेळ आहे. मात्र, चौकशी अधिक जलद करू,' अशी प्रतिक्रिया कुमार यांनी दिली.
जनहित याचिका दाखल
भाविकांच्या सुरक्षेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमबजावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. महाकुंभमेळ्यात रोज लाखो भाविकांची गर्दी होत आहे. सरकारच्या यंत्रणेवर यामुळे अधिक ताण येत असल्याचे दिसत आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक कसून तयारी केली आहे. येत्या वसंत पंचमीला अमृत स्नान होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असल्याचे महाकुंभमेळ्यासाठी नियुक्त पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितले.
कुंभमेळ्यात पुन्हा आग
चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच गुरुवारी चमनगंज चौकीजवळ लागलेल्या आगीत किमान १५ तंबू भस्मसात झाले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग लागण्याची ही सलग दुसरी घटना आहे. यापूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती. आता पुन्हा लागलेल्या आगीत १५ तंबू जळून खाक झाले.












Click it and Unblock the Notifications