आरएसएस बाबासाहेब आंबेडकरांचा सोईनुसार वापर करते; सीएम सिद्धरामय्यांचा गंभीर आरोप!
karnatak CM siddaramaiah attacks rss : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी म्हैसूर विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी समारंभात 'ज्ञान दर्शन भवना'चे उद्घाटन करताना नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. त्यांनी लोकांना सनातनवाद्यांचा सहवास पूर्णपणे टाळण्याचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सावध राहण्याचा थेट इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांनी आपली संगत जपायला हवी. त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या आणि सामाजिक बदलाचे स्वागत करणाऱ्यांसोबत राहावे. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, "सामाजिक बदलाला विरोध करणाऱ्या सनातनवाद्यांशी संबंध ठेवू नका.", आरएसएस चुकीचा प्रचार करून बाबासाहेब आंबेडकरांचा सोईनुसार वापर करतो, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.
संविधानाच्या विरोधात खोटेपणा पसरवल्याचा RSS वर गंभीर आरोप
सिद्धरामय्या यांनी यावेळी RSS वर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, RSS ने ऐतिहासिकदृष्ट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा विरोध केला आहे.
सिद्धरामय्या म्हणाले, "आरएसएसने खोटेपणा पसरवला आहे." आजही RSS आंबेडकरांच्या संविधानाला विरोध करत आहे आणि लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

'सावरकरांनी आंबेडकरांना हरवले!'
मुख्यमंत्र्यांनी यावेळी एक मोठा आणि वादग्रस्त ऐतिहासिक दावा केला. ते म्हणाले की, "डॉ. आंबेडकरांना निवडणूक हरवण्यासाठी काँग्रेस पक्षाने नव्हे, तर सावरकरांनी भाग पाडले होते."
सिद्धरामय्या पुढे बोलताना म्हणाले की, आजही समाजात मूलतत्त्ववादी विचारसरणी अस्तित्वात आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाच्या घटनेचा उल्लेख केला. ही घटना दर्शवते की समाजात रूढीवादी आणि मूलतत्त्ववादी विचारसरणी अजूनही मूळ धरून आहे. या घटनेचा निषेध केवळ दलितांनीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे, तरच समाज बदलाच्या मार्गावर आहे, असे म्हणता येईल.
आंबेडकरांचे विचार समजून घेण्याचे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर जोर दिला. डॉ. आंबेडकरांनी जगभरातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारतासाठी सर्वोत्तम संविधान तयार केले. सिद्धरामय्या म्हणाले की, ते स्वतः भगवान बुद्ध, बसवेश्वर आणि आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास ठेवतात आणि समाजात समज आणि वैज्ञानिक विचारसरणीला चालना देऊ इच्छितात. त्यांनी विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे विचार समजावेत यासाठी आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सुरू केल्याचेही यावेळी सांगितले.
कर्नाटकात RSS च्या कारवायांवर नियमन होणार
दरम्यान, कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कारवायांवर बंदी घालण्याची मागणी वाढू लागली आहे. यापूर्वी, १३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी RSS ची तुलना थेट तालिबानशी करत बंदीची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आता संघ आणि त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम बनवण्याचा निर्णय घेतला आहे.












Click it and Unblock the Notifications