India Pakistan LOC : रात्रभर सीमेवर अनेक पाक चौक्यांकडून गोळीबार, लष्कराने दिले प्रत्युत्तर : सूत्र
India Pakistan LOC : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात सद्या संतापाची लाट पसरली आहे. त्यातच भारत सरकारने कडक पाऊले उचलली, तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. अशातच, पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू ठेवला, ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
काही माध्यमांनी सैन्यातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवरून पाकिस्तानी सैन्याकडून हा गोळीबार रात्रभर केला जात होता. तथापि, या हल्ल्यात भारतीय बाजूचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, पाकिस्तानी सैन्याने सीमेवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार चालूच ठेवला होता. त्याला भारतीय सैन्याने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप सविस्तर माहिती व दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, भारतीय सैन्याचे यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर हा गोळीबाराचा प्रयत्न
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे दोन्ही शेजारी देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच ही गोळीबाराची घटना घडली.
मंगळवारी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी सीमापार संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर अनेक कडक निर्बंध लावले. ज्यात पाकिस्तानी लष्करी सहकाऱ्यांची हकालपट्टी, सहा दशकांहून अधिक जुना सिंधू पाणी कराराला दिलेली स्थगिती. अटारी लँड-ट्रान्झिट पोस्ट तात्काळ बंद करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक
गुरुवारी रात्रभर पाकिस्तान चौक्यातून सीमारेषेवर गोळीबार करण्यात आला. तर दुसरीकडे, शुक्रवारी सकाळीच उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ही चकमक कुलनार भागात झाली, जिथे दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे माहितीच्या आधारे सैन्य आणि पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती. गेल्या 2 दिवसांत ही चौथी चकमक मानली जात आहे.
सुरक्षेत त्रुटी असल्याचे सरकारने केले मान्य
पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर गुरुवारी केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे मान्य केले. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सुरक्षेत झालेल्या त्रुटींबद्दल विरोधी नेत्यांना माहिती दिली आहे.












Click it and Unblock the Notifications