हिमाचल प्रदेशात नैसर्गिक आपत्तीचा कहर: आतापर्यंत 51 मृत्यू, 22 जण बेपत्ता, नेमकं काय घडतयं?
शिमला | हिमाचल प्रदेशात यावर्षीचा मान्सून जीवघेणा ठरत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण अजूनही बेपत्ता आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने (SEOC) मंगळवारी आपल्या अहवालात दिली.

ANI वृत्तसंस्थेनुसार, 20 जून ते 1 जुलै दरम्यान राज्यातील 12 जिल्ह्यांत मानवी आणि भौतिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. मंडी जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला असून येथे एकूण 10 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण बेपत्ता आहेत. बहुतांश घटना अचानक आलेल्या पूर आणि ढगफुटीमुळे घडल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी
राज्य सरकारनुसार, या नैसर्गिक आपत्तीत 103 जण जखमी झाले आहेत. 220 घरांना फटका बसला आहे, त्यापैकी 22 घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय 84 दुकाने, गोठे आणि कामगारांच्या झोपड्यांचेही नुकसान झाले आहे. खाजगी मालमत्तेचे अंदाजे नुकसान ₹88 लाख इतके झाले आहे.
सार्वजनिक यंत्रणांनाही जबरदस्त फटका
लोक निर्माण विभाग, जल शक्ती विभाग आणि वीज विभाग या सरकारी यंत्रणांचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रांमध्ये मिळून ₹283 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. याशिवाय आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, मत्स्यपालन व पशुपालन विभागांवरही परिणाम झाला आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू?
कांगडा - सर्वाधिक 13 मृत्यू
मंडी, चंबा - प्रत्येकी 6 मृत्यू
कुल्लू - 4 मृत्यू
किन्नौर, शिमला, ऊना - प्रत्येकी 2 ते 4 मृत्यू
सिरमौर, सोलन - काही मृत्यूंची नोंद
केवळ 1 जुलै रोजी 7 मृत्यूंची नोंद झाली असून त्यात बिलासपूर व मंडीमध्ये प्रत्येकी एक, कुल्लूमध्ये रस्ते अपघातात 3 आणि चंबामध्ये रस्ते अपघातात 2 जणांचा समावेश आहे.
पशुधनालाही मोठा नुकसानीचा फटका
नैसर्गिक आपत्तींमुळे 84 जनावरांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत आकडेवारीत नमूद आहे. जून महिन्यात एकूण 830 जनावरांचे बळी गेल्याचे समोर आले होते.
मदत कार्य आणि प्रशासनाचा इशारा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. शिमला येथील राज्य नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 1070 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हिमाचल प्रदेश सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्या, आणि अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळा. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.












Click it and Unblock the Notifications