आसाम, प. बंगालसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा; जाणून घ्या मतदान व निकाल कधी लागणार?
Assembly election dates 2026 India : भारताच्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा सादर केला. एकूण 824 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल 174 दशलक्ष (17.4 कोटी) मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करणार आहेत. त्यांनी राज्यनिहाय विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
त्यामध्ये, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी मतदान; तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल रोजी आणि बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान; सर्वांचे निकाल 4 मे रोजी.

निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल?
- आसाम, केरळ आणि पदुच्चेरी या तीनही ठिकाणी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तीन राज्यात 9 एप्रिलला मतदान होईल. तर 4 मे ला निकाल जाहीर होतील.
- तामिळनाडूतही एकाच टप्प्यात निवडणूक होईल. तामिळनाडूमध्ये सर्व 234 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होईल. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होतील.
- पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडेल. तर दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान पार पडेल. यानंतर 4 मे रोजी मतमोजणी होईल.
- आसाममध्ये 126 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होईल. आसाममध्ये 9 एप्रिलला सर्व 126 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होतील.
- या निवडणुकीसाठी सर्व उमेदवार हे 23 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकणार आहेत. तर 26 एप्रिलला अर्ज मागे घेता येईल.
"तरुणांनो, तुमची निवड भविष्य घडवेल!" : निवडणूक आयुक्तांचे आवाहन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशातील तरुण पिढीला आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवतरुणांना खास आवाहन केले. ते म्हणाले:
"मतदान करणे ही केवळ प्रक्रिया नसून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी आहे. तुमचे एक मत तुमची निवड दर्शवते आणि तीच निवड देशाचे भविष्य घडवते. भारतीय निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे, त्यात तरुणांनी उत्साहाने सहभागी व्हावे."
ग्राऊंड झिरोवर निवडणूक आयोगाची तयारी
निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यापूर्वी आयोगाने सर्व राज्यांचा दौरा करून तयारीची खातरजमा केली आहे.
राजकीय पक्षांशी संवाद: मुख्य निवडणूक आयुक्तांनी पाचही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली. यावेळी सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या सूचना आणि शंकांचे निरसन करण्यात आले.
प्रशासकीय आढावा : आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची (CEO) भेट घेतली. तसेच, मतदार नोंदणी प्रक्रियेत (SIR) मोलाचे योगदान देणाऱ्या 'बीएलओ' (BLO) कर्मचाऱ्यांचा आणि नवीन मतदारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पारदर्शकता : शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला आहे.
आसाम व केरळमधील अद्वितीय मतदान केंद्रे उघड केले!
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, आसाम आणि केरळमध्ये देखील अद्वितीय मतदान केंद्रे आहेत. आसाममध्ये मतदान पथके माजुलीपासून बोटी आणि रस्त्याने ५०-६० किमीचा कठीण प्रवास करतात, ब्रह्मपुत्र नदी ओलांडतात आणि शेवटी २४८ मतदारांना घेऊन ट्रॅक्टरने दुर्गम धनेखाना मतदान केंद्रावर पोहोचतात.
केरळ मधील मतदान केंद्रे?
इडुक्की जिल्ह्यातील आदिवासी भागात असलेले बूथ क्रमांक ३४ एडमलाकुडी, एकूण ६९३ मतदारांसह, एक अद्वितीय दुर्गम मतदान केंद्र आहे, जिथे मतदान अधिकारी खडतर आणि कठीण रस्त्यांवरून एका विशेष वाहनाने ३० किमी प्रवास करतात आणि त्यानंतर ८ किमी चालतात.












Click it and Unblock the Notifications