..पुन्हा जर हल्ला केला तर याद राखा..आम्ही पूर्णपणे सज्ज; सीजफायरनंतर इंडियन आर्मीचा Pakला सज्जड दम!
India-Pak Ceasefire : देशाच्या संरक्षणासाठी आम्ही कायम सज्ज आहोत. यापुढे कोणतीही आगळीक अथवा उपद्रव केल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. यापुढे हल्ला केलात तर खबरदार, आम्ही कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सज्ज आहोत, असा थेट इशारा कमांडर रघू नायर यांनी पाकिस्तान सैन्याला दिला आहे.
सीजफायरची घोषणा दोन्ही देशांकडून करण्यात आली. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेला कमांडर रघू नायर यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषद संपत असताना नायर यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला.

कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं चालू घडामोडींबद्दल महत्त्वाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे खोडून काढले.
भारताच्या ब्रह्मोसचं नुकसान झाल्याचा, हवाई तळांचं प्रचंड नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आला. त्यात काडीमात्र तथ्य नाही. हा दावा बिनबुडाचा असल्याचं कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सोफिया कुरेशी म्हणाल्या की, गेल्या काही तासांमध्ये पाकिस्तानकडून बरीच चुकीची माहिती पसरवण्यात आली आहे. कर्नल सोफिया कुरेशींनी पाकिस्तानचा समाचार घेतला. 'जेएफ-१७ विमानानं एस-४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या बेसचं नुकसान केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. तो पूर्णत: चुकीचा आहे.
सिरसा, जम्मू, पठाणकोट, भुजमध्ये हल्ला केल्याचा दावादेखील खोटा आहे. चंदिगढ आणि ब्यास येथील शस्त्रागारावर केलेल्या हल्ल्याचा दावाही खोटा आहे. आपल्या सैन्याचे सगळे तळ सुरक्षित आहेत. त्यांचं कोणतंही नुकसान झालेले नाही,' अशी माहिती कुरेशी यांनी दिली.
भारतानं कोणत्याही मशिदीचं नुकसान केलं नाही
'भारतानं मशिदींचं नुकसान केल्याचं पाकिस्तान सांगत आहे. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतीय सैन्यानं आपल्या मूल्यांची झलक दाखवून दिली आहे. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचं नुकसान झालं आहे.
भारतानं पाकिस्तानच्या स्कर्दू, जकूबाबाद, सरगोदा आणि बुलोरामधील हवाई तळाचं मोठं नुकसान केलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणा, रडार यंत्रणा फेल केल्या,' असा तपशील कुरेशी यांनी माध्यमांना दिला.
पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचा सिंह यांचा दावा
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षात पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. लष्कर असो वा हवाई दल पाकिस्तानची मोठी हानी झालेली आहे, अशी माहिती व्योमिका सिंह यांनी दिली.












Click it and Unblock the Notifications