Mumbai News : कोरोनामुळे ठाण्यातील अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मुंबईत एकाच दिवसात एवढे रुग्ण
Mumbai News 21 year old dies of Covid-19 in Thane : महाराष्ट्रात खासकरुन मुंबई आणि पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाण्यात एका 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यंदा सुरु झालेल्या कोरोनाच्या संसर्गात मृत्यू झालेला हा पहिला रुग्ण आहे.
प्राप्त माहितीनुसार, 21 वर्षीय रुग्ण कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होता. त्याची कोरोना चाचणीही पार पडली होती, यात त्याचा अहवाल पाॅझिटीव्ह आला , या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला असून आज सकाळी ही माहीती समोर आली आहे.

मुंबईत रुग्णसंख्या पोहचली 185 वर
मिडिया रिपोर्टनुसार, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, 23 मे रोजी एकाच दिवशी मुंबईत 35 रुग्ण आढळले तर मुंबईत रुग्णसंख्या 185 वर पोहचली, सध्या संसर्ग वाढू शकतो अशी शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचं मुंबई महापालिकेकडून आवाहन करण्यात आलं आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, देशात कोरोनाचे एकूण रुग्णसंख्या 257 इतकी असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक राज्यात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे अहवाल सांगतो.
कोरोनाचा JN.1 प्रकार काय आहे?
JN.1 प्रकार हा कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन फॅमिलीतील एक नवीन उपप्रकार आहे.
या उपप्रकाराला पूर्वी BA.2.86.1 म्हटले जात होते. त्यात सुमारे 30 अनुवांशिक उत्परिवर्तन झाले आहेत, जे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतात.
JN.1 मध्ये वेगाने पसरण्याची क्षमता आहे, खासकरुन ज्यांना पूर्वी संसर्ग झाला किंवा ज्यांना लसीकरण करण्यात आले आहे अशा लोकांमध्ये हा संसर्ग वेगाने होऊ शकतो.
किती घातक आहे JN.1?
जेएन-1 ची सध्या लक्षणे गंभीर मानली जात नाहीत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, हा प्रकार जगभरात सर्वात सामान्य बनला आहे. त्याची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात आणि जर ती दीर्घकाळ टिकली तर ती दीर्घकालीन कोविडला कारणीभूत ठरू शकतात.
केंद्राकडून कोविड रुग्णांचा आढावा
कोरोना रुग्णांची देशात वाढ होत असतानाच आता केंद्रीय आरोग्य विभाग सतर्क झाला आहे, पीटीआयने सुत्रांच्या हवाल्यानुसार वृत्त दिले, त्यानुसार, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी शनिवारी केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमधून आढळलेल्या अलिकडच्या कोविड-19 प्रकरणांचा आढावा घेतला. यापैकी बहुतेक प्रकरणे सौम्य आहेत आणि त्यांना घरीच अलगीकरण करून व्यवस्थापित केले जात आहे, असे असले तरीही केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क असून परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे.












Click it and Unblock the Notifications