'हा' मराठी कलाकार दिसणार सुभाषचंद्र बोस यांच्या भुमिकेत नेताजीवर आधारीत 'आझाद भारत' सिनेमाबद्दल वाचा
Azad Bharath Movie Review : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती महिन्याचे औचित्य साधून प्रदर्शित झालेला 'आझाद भारत' हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक सिनेमा नाही, तर तो १९४० च्या दशकातील क्रांतीची धगधगती मशाल आहे. इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेली पहिली महिला क्रांतिकारी 'नीरा आर्या' यांची गाथा पडद्यावर जिवंत करण्यात दिग्दर्शिका आणि अभिनेत्री रूपा अय्यर यांना मोठे यश आले आहे.

चित्रपटाचे कथानक आणि अभिनय
'आझाद भारत' हा चित्रपट आझाद हिंद फौजेच्या मोहिमेवर आधारित आहे. पण या कथेचा खरा आत्मा आहे 'राणी झाशी रेजिमेंट'च्या वीर महिला आणि नीरा आर्या यांचा अंगावर शहारे आणणारा प्रवास.
रूपा अय्यर (नीरा आर्या) : रूपा अय्यर यांनी नीरा आर्या यांची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली आहे. आपल्या पतीची (प्रियांशु चॅटर्जी) हत्या करतानाचा त्यांचा सीन आणि "तुमच्यासारख्या ब्रिटिशांच्या कुत्र्यांच्या हाती नेताजी कधीच लागणार नाहीत," हा संवाद थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट मिळवून जातो.
श्रेयस तळपदे (नेताजी) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भूमिकेत श्रेयस तळपदेने अप्रतिम काम केले आहे. त्याची देहबोली आणि "स्त्रीने जेव्हा काही करायचे ठरवले, तेव्हा तिला कोणीच रोखू शकत नाही," हा संवाद चित्रपटाच्या थीमला एका वेगळ्या उंचीवर नेतो.
सहकलाकार कोण कोण?
सुरेश ओबेरॉय आणि इंदिरा तिवारी यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला असून, अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट खूपच प्रभावी ठरला आहे.
दिग्दर्शन आणि संवाद
दिग्दर्शिका म्हणून रूपा अय्यर यांनी सखोल संशोधन केले आहे. अज्ञात क्रांतिकारकावर चित्रपट बनवण्याची जोखीम त्यांनी लिलया पेलली आहे. चित्रपटातील संवाद हे या सिनेमाचे मुख्य बलस्थान आहेत. "प्रेम करायचे असेल तर आपल्या देशावर करा" किंवा "क्रांतीची तलवार विचारांच्या धारेने धारदार होते," असे संवाद मनावर खोलवर परिणाम करतात.
संगीत आणि पार्श्वसंगीत
चित्रपटाचे पार्श्वसंगीत कथेच्या वेगाला साजेसे आहे. 'जय हो' या गाण्यातील जोश प्रेक्षकांमध्ये देशभक्तीचे स्फुरण भरतो. नव्या पिढीला भारताचा खरा इतिहास समजण्यासाठी हा चित्रपट अनुभवणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications