प्रताप सरनाईक ; शिवसेनेचा धोरणी चेहरा, ठाण्यासह मीरा भाईंदरवरही वर्चस्व
Maharashtra Assembly Election 2024 : "शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना" असे म्हटले जाते. ठाणे शहरात शिवसेना झपाट्याने फोफावली. आनंद दिघे, प्रकाश परांजपे, एकनाथ शिंदे अशा नेत्यांनी शिवसेना ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यात रुजवली आणि वाढवली. ठाण्यातून सुरू झालेला शिवसेनेचा झंजावात पार पालघर, मीरा-भाईंदर पर्यंत पोहोचला.
मुंबई शहरात शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याच्या आधी ठाण्यात शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. तळागाळात काम करणारे नेते आणि शिवसैनिक असल्यामुळे ठाणे शहराच्या प्रत्येक वार्डात शिवसेनेचे संघटन अत्यंत मजबूत असे आहे. संघटनात्मक प्राबलल्यामुळे ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि मीरा-भाईंदर शहरात शिवसेनेचे वर्चस्व दिसून येते.
ठाणे शहरावर जबरदस्त पगडा असल्यामुळे अनेक नवीन नेते संघटनेशी जोडले गेले. ज्यात प्रताप सरनाईक हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विद्यार्थी चळवळीतून सामाजिक कामाला सुरुवात करणारे प्रताप सरनाईक यांनी बांधकाम क्षेत्रातही स्वतःचा लौकिक निर्माण केला आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाणे शहरातील विविध सांस्कृतिक उपक्रमांना त्यांचा वरदहस्त लाभतो. शहरातील सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यात प्रताप सरनाईक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

मीरा-भाईंदर मध्येही शिवसेनेचे संघटन विस्तारण्यात आणि शहराच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यात प्रताप करणे अग्रेसर असतात. मुलगे पूर्वेश आणि विहंग तसेच पत्नी परीसा सरनाईक हे देखील संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. विहंग उद्योग समूहाचा डोलारा प्रचंड विस्तारला आहे. वर्धा जिल्ह्याचे असलेल्या प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात केलेले काम आणि संघटनेचा केलेला विस्तार तसेच शहरावर निर्माण केलेली स्वतःची मजबूत पकड हा एक कौतुकाचा विषय आहे.
शिवसेनेकडून विधिमंडळात
2009 साली प्रताप सरनाईक यांना शिवसेनेकडून ओवळा माजिवडा या ठाण्याचा परिसरातून विधानसभेचे तिकीट देण्यात आले. 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन निवडणुकात या मतदारसंघातून ते विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. मतदारसंघावर बसवलेली मजबूत पकड हे त्यांच्या विजयाचे खरे गमक आहे.
पत्राकडे उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले तर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रचंड संघर्ष दोन वर्षे सुरू होता. भाजपशी निवडणूक पूर्व युती केलेली असताना निवडणुकीच्या पश्चात भलत्याच पक्षांशी समझोता करून सत्ता स्थापन करणे शिवसेनेतील अनेक नेत्यांना रुचले नव्हते. प्रताप सरनाईक हे त्यापैकी एक होते. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी केलेला घरोबा मोडावा आणि पुन्हा भाजपशी युती करावी असा आग्रह करणारे पत्र सर्वात आधी प्रताप सरनाईक यांनी लिहिले होते. आणि त्याचा प्रचंड गाजावाजा झाला होता. पण उद्धव ठाकरे यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केले आणि भाजपशी असलेला संघर्ष सुरूच ठेवला.
सरनाईक यांची एकनाथ शिंदे यांना साथ
2022 च्या जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिले. पक्षात सातत्याने मिळणारी अपमानास्पद वागणूक हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार निघून गेले. आठ मंत्र्यांनीही एकनाथ शिंदे यांना साथ दिली. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रताप सरनाईक यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. विशेषतः मीरा-भाईंदर मध्ये संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्याची सूचना प्रताप सरनाईक यांना करण्यात आली तसेच त्यांचे चिरंजीव पूर्वेश नाईक यांच्याकडे युवा सेनेच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली.
कॅशलेस रुग्णालयाची निर्मिती
राजकीय पटलावर अशा हालचाली गतिमान होत असतानाही प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजिवडा मतदार संघाच्या विकासाकडे बारकाईने लक्ष दिले. गेल्या पंधरा-वीस वर्षात ठाणे शहर झपाट्याने बदलत आणि वाढत आहे. शहरात विविध सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघातही विविध सुविधांची निर्मिती व्हावी यासाठी प्रताप सरनाईक सातत्याने प्रयत्नशील राहिले. विशेषतः आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम आणि आधुनिक असावी याकडे त्यांचा कटाक्ष होता म्हणूनच मीरा-भाईंदर आणि ठाणे येथे त्यांच्या प्रयत्नातून कॅशलेस रुग्णालयांची उभारणी करण्यात आली. या माध्यमातून स्थानिकांना महत्त्वाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
लता मंगेशकर नाट्यगृह आणि समुदाय भवने
प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यातून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत उभारण्यात आलेले भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह विविध कार्यक्रम आणि सोहळ्यांसाठी हक्काचे ठिकाण ठरले आहे. विविध समाजाच्या स्थानिक नागरिकांना त्यांचे कौटुंबिक सण आणि समारंभ साजरी करण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ठाण्यात समुदाय भवने उभी करून देण्यात आली आहेत.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे
ठाणे शहर आणि परिसरात देखील स्पर्धा परीक्षा देण्याकडे मुलांचा कल आहे. त्यांना सुविधा देण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच महिला सक्षमीकरणासाठी हिरकणी हा महत्त्वाचा प्रकल्प देखील सरनाईक यांच्या प्रयत्नातूनच साकारला आहे.
पुन्हा विधानसभेत प्रवेशासाठी सज्ज
सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी मुंबईतील गोविंदा पथकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. हजारो ठाणेकर या हंडीसाठी उपस्थित असतात तसेच सेलिब्रिटींची मांदियाळी देखील या दहीहंडी उत्सवाला आवर्जून उपस्थित असते. विविध प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम राबवण्यावरही संस्कृती प्रतिष्ठानने भर दिला आहे त्या माध्यमातून ठाण्यात एक मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली आहे. शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमांना प्रताप सरनाईक यांचे नेहमीच पाठबळ असते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही सरनाईक यांचे सूर चांगलेच जुळले आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात प्रताप सरनाईक यांना संधी देण्यात आली आहे. आपल्या व्यावसायिक तसेच सांस्कृतिक उपक्रमातून मतदारसंघातील नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रताप सरनाईक पुन्हा एकदा विधानसभा प्रवेशासाठी सिद्ध झाले आहेत












Click it and Unblock the Notifications