सावधान, वणवा पेट घेत आहे ! "हिंदीची सक्ती म्हणजे महाराष्ट्र द्रोह", राज ठाकरे संतापले
राज्य सरकारच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया दिली. या निर्णयाचा तीव्र निषेध करत त्यांनी सरकारला जाब विचारत अनेक गंभीर मुद्द्यांना वाचा फोडली. त्यांच्या मते, हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, ती फक्त उत्तर भारतातील काही राज्यांची भाषा आहे आणि ती महाराष्ट्रावर लादणं अन्यायकारक आहे.

"हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही" - मनसेचा रोष
राज ठाकरे म्हणाले, "हिंदी ही सक्तीने शिकवण्यासारखी भाषा नाही. राज्य सरकारने जर पहिलीपासून ती सक्तीने शिकवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ती पूर्ण ताकदीनं रोखू." त्यांनी याआधीही दोन वेळा पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी म्हटलं.
उत्तर भारतीय IAS लॉबीचा दबाव?
ठाकरे यांनी यावेळी एक नवा आरोप करत सांगितलं की, "महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यामागे उत्तर भारतातील काही आयएएस अधिकाऱ्यांची लॉबी आहे. माझ्याकडे त्यांची नावे आहेत." त्यांचा दावा होता की, या लॉबीमुळे हिंदी पुस्तकांची छपाई सुरू झाली असून, ती राज्यात विकली जाणार आहे.
"मराठी अस्तित्वाला धोका"
राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार, "ही फक्त भाषेची सक्ती नसून, भविष्यात मराठी संस्कृती, भाषा आणि अस्मितेवर घाला घालणारा डाव आहे." त्यांनी सरकारला आव्हान देत स्पष्ट केलं की, जर हिंदीची सक्ती केली गेली, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याशी गद्दारी ठरेल.
राज्यशिक्षण धोरणावर सवाल
राज ठाकरे यांनी विचारलं की, "राष्ट्रीय शिक्षण धोरणात तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा कुठेही उल्लेख नाही. मग महाराष्ट्रातच का सक्ती केली जात आहे? जर तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये हिंदी सक्तीची गरज नाही, तर महाराष्ट्रात ती का?"
"हिंदी पुस्तकांची छपाई सुरु कशी?"
जर सरकार सांगत असेल की हिंदी ऐच्छिक आहे, तर मग पुस्तकांची छपाई का सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "हे सगळं मराठीतून हिंदीकडे वळण्याचा गुप्त प्रयत्न आहे. महाराष्ट्रात जाणीवपूर्वक मराठीला बाजूला टाकण्याचा कट रचला जात आहे."
लेखक, साहित्यिक, शिक्षकांना आवाहन
राज ठाकरे यांनी मराठी साहित्यिक, लेखक, कलाकार आणि शिक्षक वर्गाला एकजुटीने आवाज उठवण्याचं आवाहन केलं. "जर आपण आता बोललो नाही, तर मराठी भाषा आणि तिचं अस्तित्व धोक्यात येईल."
मोदी-शहा यांच्या राज्यात सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का?
त्यांनी विचारलं की, "जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यातही हिंदीची सक्ती नाही, तर महाराष्ट्रातच ती का लादली जाते आहे?"
शाळांनी विरोध करावा - राज ठाकरे यांचे आवाहन
राज ठाकरे यांनी पालक आणि शाळांना हिंदीच्या सक्तीविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं. "हे फक्त भाषेचा विषय नाही, तर महाराष्ट्राच्या आत्म्याचा प्रश्न आहे. जर हे थांबवलं नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल."
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा खुलासा
अखेर त्यांनी सांगितलं की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात बोलणं झालं आहे. त्यांनी हिंदीची सक्ती मागे घेतो असं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसत आहे. त्यामुळे आम्ही आता शांत बसणार नाही."












Click it and Unblock the Notifications