प्रत्येक मतदारसंघात 15 कोटी पोहोचल्यावर निवडणुकीची घोषणा; पहा, संजय राऊत नेमकं काय म्हणाले...
मुंबई : महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी एक मोठा आरोप केला. काल रात्रीपर्यंत महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराकडे 10 ते 15 कोटी पोहोचल्यानंतर आज निवडणुकीची घोषणा होत असल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला. निवडणक आयोगाने विरोधकांना विनाकारण छळू नये व पैशाचा दुरुपयोग होऊ नये, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.
सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक मतदारसंघात वाटले 15 कोटी
मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. आज निवडणुकीची घोषणा होईल, आचारसंहिता लागेल, याची पक्की खबर सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे पहिला हप्ता म्हणून त्यांच्या उमेदवारांना पैशाचं वाटप करण्यात आलं. सत्ताधाऱ्यांनी काल रात्रीपर्यंत प्रत्येक मतदारसंघात 10 ते 15 कोटी रुपये दिले, असा दावा करत संजय राऊतांनी हे पुरावे निवडणूक आयोगाकडे देणार असल्याचंही सांगितलं. मात्र या तक्रारीचं काहीच होणार नाही, असा आरोपही त्यांनी केला. ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत आहे, त्याचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. किंबहुना हे सर्व पैशांचं वाटप झाल्यावरच निवडणुकांची घोषणा होतेय का, अशी शंकाही राऊत यांनी व्यक्त केली.

निवडणुका एकाच टप्प्यात व्हाव्यात
निवडणूक आयोगाने कोणत्याही दबावाखाली निवडणुका घेऊ नयेत, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने जागरूक रहायला हवं, ही आमची माफक अपेक्षा असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोकळेच आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचं परदेशात वगैरे फिरून झालं आहे, असा टोला संजय राऊत लगावत महाराष्ट्रातील निवडणुका या एका टप्प्यात व्हायला हरकत नाही, अशी अपेक्षाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.
आमदारांचा शपथविधी हा घटनाबाह्य
संजय राऊत म्हणाले, एका बाजूला देवेंद्र फडणवीस घर घर संविधान, अशा गर्जना करत आहेत. जाहिराती करत आहेत , उपक्रम राबवत आहेत. पण तुमचं राज्यातलं प्रत्येक कृत्य हे संविधानाच्या विरोधातलं आहे. सात आमदारांची पाठवलेली यादी ही पूर्णपणे संविधानाच्या विरुद्ध आहे, घटनाबाह्य आहे, असा आरोप राऊत यांनी केला. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच महायुतीच्या 7 आमदारांचा शपथविधी होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. आम्ही दिलेली यादी प्रलंबीत ठेवत आज होणारा शपथविधी हा राज्यपालांना हाताशी धरून केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.












Click it and Unblock the Notifications