मविआतील जागावाटपाचा वाद मिटला; काँग्रेसच असणार मोठा भाऊ; वाचा- कोणाला किती जागा मिळणार
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महाविकास आघाडीतील कॉंग्रेस अन् शिवसेना ठाकरे गटातील वाद अखेर निवळला आहे. नाना पटोले यांच्या जागी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई कामाला आली असून मविआचा जागावाटप फार्म्यूला ठरला आहे.
यात कॉंग्रेस सर्वाधिक जागा लढणार असून त्यापाठोपाठ ठाकरेंची शिवसेना व त्यानंतर शरद पवार यांच्या एनसीपी पक्षाला जागा मिळणार आहेत. विशेष म्हणजे मुंबईत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागावाटपाचा हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे.

कसा असणार जागावाटपाचा फॉर्म्युला
महाविकास आघाडीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस-105 ते 108 जागांवर निवडणूक लढेल. तर, शिवसेना ठाकरे गटाला 90 ते 95 जागा देण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीत (MVA) तिसऱ्या नंबरचं स्थान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 80 ते 85 जागा देण्यात येणार असून मित्र पक्षांसाठीही जागा सोडण्यात येत आहेत. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसाठी 3 ते 6 जागा सोडण्यात आल्याचे समजते.
थोरातांची शिष्टाई फळाला
बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई फळाला आलेली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीत मुंबई आणि विदर्भावरुन सुरू असलेला वाद अखेर निवळला आहे. बाळासाहेब थोरांत यांच्या मध्यस्तीनंतर ठाकरे आणि काँग्रेसनं सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार, महाविकास आघाडीतील मुंबईच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.
मुंबईत ठाकरेंची शिवेसनाच मोठा भाऊ
मुंबईत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरे गट लढवणार असून शिवसेना ठाकरे युबीटी पक्षाला 18 जागा देण्यात येत आहेत. तर, काँग्रेस 14 जागांवर निवडणूक लढेल. ( त्यापैकी 11 जागांवर शिक्कामोर्तब तर 2 जागांवर चर्चा सुरू आहे). शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) मुंबईत केवळ 2 जागा मिळणार आहेत. (अणुशक्ती नगर आणि घाटकोपर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता). तर, समाजवादी पार्टी- 1 (शिवाजी नगर) आणि आम आदमी पक्ष 1 जागा सुटणार असल्याचा मुंबईतील फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. दरम्यान, मुंबईतील वर्सोवा, भायखळा आणि वांद्रे पुर्व या तीन जागांवर ठाकरे गट आणि कांग्रेसमध्ये आज तोडगा निघणार आहे.
शरद पवारांनी केली मध्यस्थी
विरोधी पक्ष त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करू पाहत होते. यामध्ये प्रामुख्याने MVA ने त्यांच्या प्रतिस्पर्ध्याच्या 17 विरुद्ध लोकसभेच्या 30 जागा जिंकल्या. तर दुसरीकडे काँग्रेसने लढलेल्या 17 पैकी 13 जागा जिंकल्या आणि शिवसेना-UBT ने 21 पैकी 9 जागा जिंकल्या. मित्रपक्षांमध्ये सुरुवातीला जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात जागावाटपाबाबत चांगलाच वाद रंगला होता. त्यामुळे पक्षनेतृत्वाने यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली. हे मतभेद दूर करण्यासाठी, MVA नेत्यांनी शनिवारी दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये नऊ तासांची मॅरेथॉन बैठक घेतली. सूत्रांनुसार, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) या दोन्ही नेत्यांनी त्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी आणि विरोधी आघाडीतील मतभेद सोडवण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क साधला.












Click it and Unblock the Notifications