सावधान हवामान बदलतेय! महाराष्ट्रात सकाळी थंडी, दुपारी गरमी; उत्तर भारतातही गारठला
Maharashtra Weather Updates : उत्तर भारतात धुके आणि थंडीने कहर केला असतानाच त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातही बसत आहे. राज्यात थंडी चांगलीच पडली असून दिवसा मात्र उष्ण वातावरण जाणवत आहे. त्यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी गरमी अशी स्थिती राज्यात आहे.
कुठे कसे तापमान घसरले
मागील 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 1-3 अंशांनी तापमाना घसरले. तर कोकण, मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत 1-3 अंश अधिक तापमानाची नोंद झाली. हवेत गारठा असून कोरडे थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंड वातावरण आहे. येत्या काही दिवसात राज्यात गारठा काहीसा वाढणार आहे. तर दुसरीकडे पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारसा बदल नाही.

सातारा, सांगली, 14-17 अंश सेल्सियस, पुण्यात 12-18 अंश सेल्सियस पर्यंत तापमान होते. सामान्य तापमानाच्या तुलनेत हे तापमान अधिकच नोंदवले गेले. अजून एकाही जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला नव्हता. बहुतांश महाराष्ट्रात 13- 23 अंशांवर तापमान नोंदवण्यात आलं असून परभणीत 11 अंशावर किमान तापमान पोहचले आहे.
..म्हणून थंडी होतेय कमी-जास्त
चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या पुर्वांचलमधील आसाम आणि परिसरात सक्रीय आहे. गुजरातपासून राजस्थानसह बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, याचा परिणाम म्हणून वायव्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचे झोत वाहत असून थंडी कमी जास्त होत आहे.
महाराष्ट्राचा हवामान अंदाज
- हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 3-4 दिवसांत कमाल तापामानात फारसा बदल होणार नाही.
- किमान तापमान येत्या 3 दिवसांत 3-4 अंशांनी कमी होणार आहे. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.
- विदर्भात येत्या दोन दिवसात किमान आणि कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून त्यानंतर तापमान 2-3 अंशांनी घसरेल.
- राज्यात पुढील पाचही दिवस कोरड्या हवामानाची शक्यता असून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने गारठा वाढणार आहे.
- गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान काहीसे वाढले होते. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करावा लागला. आता तापमानात पुन्हा घट होणार आहे.
उत्तर भारत गारठला
उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्यासह तापमानात घट होत आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही भागात बर्फवृष्टी झाली असून त्यामुळे थंडीची लाट कायम आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसह इतर अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पुढील आठवड्यात उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.












Click it and Unblock the Notifications