पुण्यात टोळीयुद्ध, लातूरमध्येही रक्तरंजित घटना;मुंबई पॅटर्न पुन्हा राबवण्याची मागणी
एकेकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याने आता "गुन्हेगारीची राजधानी" अशी नवी ओळख धारण केली आहे. शहरात सर्रासपणे टोळीयुद्धातून हत्या आणि हल्ले होत आहेत. या घटना ताज्या असतानाच लातूरमध्ये किरकोळ वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करून त्याच्यासोबत असलेल्या तरुणीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पुण्यातील गुन्हेगारीचा नवा अध्याय
पुण्यातील गुन्हेगारी नवीन नाही. सुमारे चार दशकांपूर्वी आंदेकर-माळवदकर टोळीयुद्धाने शहरात दहशत निर्माण केली होती. त्यानंतर गणेश मारणे, गजानन मारणे आणि संदीप मोहोळ यांच्या टोळ्यांचा उदय झाला. जमिनीच्या वादातून, वर्चस्वासाठी या टोळ्यांमध्ये अनेक रक्तरंजित संघर्ष झाले. शरद मोहोळच्या हत्येनंतर पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज शहरातील कोथरूड, मुळशी, येरवडा आणि इतर अनेक भागांमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसारखे गुन्हे वाढले आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, गुन्हेगारी टोळ्यांचा सुळसुळाट वाढल्याने हत्येच्या प्रयत्नासारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
हैवान आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठले
पुण्यातील कोथरूडमध्ये एका सामान्य नागरिकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. निलेश घायवळ टोळीतील मयुर कुंभारे नावाच्या व्यक्तीने प्रकाश धुमाळ नावाच्या सर्वसामान्य नागरिकावर गोळ्या झाडल्या. गाडीला रस्ता न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा गोळीबार झाला असल्याचं समोर आलं आहे. या घटनेत प्रकाश धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढण्याची कारणे
महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत. वाढती बेरोजगारी हे त्यापैकी एक मुख्य कारण मानले जाते. अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही, ज्यामुळे ते झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारीकडे आकर्षित होतात. गुन्हेगारांचे चित्रण करणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांमुळेही तरुणांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येते. याशिवाय, अवैध दारू अड्डे, जुगार आणि अमली पदार्थांच्या विक्रीतून गुन्हेगारी टोळ्या आर्थिक कमाई करत आहेत. जमिनीचे वाद, राजकीय आश्रय आणि पोलिसांवरील राजकीय दबाव ही देखील गुन्हेगारी वाढीची महत्त्वाची कारणे आहेत.
मुंबई पॅटर्नची आठवण
एकेकाळी मुंबईमध्येही अंडरवर्ल्ड आणि संघटित गुन्हेगारीचा मोठा दबदबा होता. दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन यांसारख्या टोळ्यांनी मुंबईला वेठीस धरले होते. खंडणी, खून, आणि धमक्यांमुळे मुंबईकर त्रस्त झाले होते. त्यावेळी मुंबई पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी विशेष रणनीती आखली.
- मोक्का कायदा (MCOCA): महाराष्ट्र सरकारने 1999 साली संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कठोर कायदा लागू केला. या कायद्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे विशेष अधिकार मिळाले, ज्यामुळे टोळीवाल्यांचे कंबरडे मोडले.
- इन्काउंटर स्पेशालिस्ट्सची टीम: मुंबई पोलिसांनी विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, दया नायक, प्रदीप शर्मा यांसारख्या 'इन्काउंटर स्पेशालिस्ट' अधिकाऱ्यांची एक विशेष टीम तयार केली. या टीमने अंडरवर्ल्डच्या अनेक म्होरक्यांना आणि शूटरना थेट इन्काउंटरमध्ये ठार केले. यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण झाली आणि संघटित गुन्हेगारीची साखळी तुटायला सुरुवात झाली.
- राजकीय इच्छाशक्ती: तत्कालीन सरकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळणार नाही, याची खात्री केली. त्यामुळे पोलिसांना कोणत्याही दबावाशिवाय काम करणे शक्य झाले.
या सर्व उपायांमुळे मुंबईतील संघटित गुन्हेगारी जवळपास संपुष्टात आली आणि शहरात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली.
राज्यातही मुंबई पॅटर्नची मागणी
महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये, विशेषतः पुण्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमधून आणि तज्ज्ञांमधून मुंबई पॅटर्न पुन्हा राबवण्याची मागणी जोर धरत आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, पोलिसांना काम करण्याचे स्वातंत्र्य देणे आणि राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे थांबवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. जर वेळीच कठोर पाऊले उचलली नाहीत, तर ही गुन्हेगारी संपूर्ण राज्याला आपल्या विळख्यात घेईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications