लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये ऐवजी 500 रुपये मिळणार ? मंत्री आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील लोकप्रिय 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेवरून सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र आता नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपयेच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून, योजनेत कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आहे की, "दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.
त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 774148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.
एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे, असं स्पष्टीकरण मंत्री तटकरे यांनी दिलं आहे.
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी… pic.twitter.com/485UFXrRiq
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 15, 2025
कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घ्या- अजित पवार
"आमच म्हणणं आहे की,दोन्ही योजनेत पात्र ठरलेल्या महिलांनी कुठल्याही एका योजनेचा लाभ घ्यावा. महिलांना केंद्राची योजना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थात काही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना ही आहे. हा लाभ मिळत नसेल तर दीड हजार रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ घ्यायचा ते आपण आपल्या लाडक्या बहिणींवर सोपवलं आहे", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
योजनेचा उद्देश आणि सुरुवात
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी 2024 मध्ये सुरू केली. या योजनेत 18 ते 65 वयोगटातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि राज्यात स्थायिक असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये सन्माननिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेने महायुती सरकारच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, असे मानले जाते. आतापर्यंत 2.3 कोटींपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.












Click it and Unblock the Notifications