श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? दरे गावातून निघण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान!
Eknath Shinde Press conference in Dare village : प्रकृती अस्वास्थामुळे दरे या मुळगावी आरामासाठी गेलेले राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथून मुंबईला निघण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. आपली प्रकृती चांगली असल्याचे खुद्द त्यांनीच माध्यमांसमोर सांगितले आहे. त्यामुळे आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी मुंबईत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळावर अंतीम शिक्कामोर्तब करण्यासंदर्भात बैठक अपेक्षित आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले, मी दरे या माझ्या मुळ गावी आरामासाठी आलो होतो. निवडणुकीत खूपच धावपळ झाली, अनेक लोक मला भेटले, या धावपळीमुळे मी आजारी पडलो होतो. आता माझी प्रकृती चांगली आहे.

मी एक-एक दिवसात आठ-आठ, दहा-दहा सभा घेतल्या. मी माझ्या दोन-अडीच वर्षाच्या कार्यकाळात सुट्टी घेतली नाही. मी येथे (दरे या गावी) आलो तरीही येथे मला लोक भेटत असतात. त्यांचा दरबार भरतो अजूनही येथे लोक मला भेटायला आलेले आहेत. मला लोकांना भेटायचे असते माझी प्रकृती थोडी खराब होती. मला एकच सांगायचे की, हे सरकार जनतेचा आवाज असलेले सरकार आहे, असेही ते म्हणाले.
#WATCH | Satara: Maharashtra caretaker CM Eknath Shinde says, "I am doing good now. I had come here to rest after the hectic election schedule... I did not take any leave during my 2.5 years as the CM. People are still here to meet me. This is why I fell ill... This government… pic.twitter.com/YYa8p7Sh1y
— ANI (@ANI) December 1, 2024
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी बुधवारी पुर्णपणे माझी भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट झाली होती, त्यांनी जो मुख्यमंत्रीपदासंदर्भात निर्णय घेतला त्याला माझा पुर्ण पाठींबा आहे. मी तो आधीच दिला आहे. त्यात काहीच किंतू-परंतु नाही. मी स्पष्टपणे भूमिका व्यक्त करणारा कार्यकर्ता आहे. मी आणि आमचे दोन सहकारी उपमुख्यमंत्री यांनी जे काम केले ते आजपर्यंतच्या इतिहासात अडीच वर्षात कल्याणकारी योजना आणि विकास कुणी केला होता का? आमचे कार्य सोनेरी अक्षराने लिहिले जाईल.
महायुतीत समन्वय
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही चांगले काम केले म्हणून आम्हाला जनतेने एवढे बहुमत दिले आहे. सरकार स्थापन होणार आहे. चांगल्या पद्धतीने सरकार स्थापन होणार आहे. त्यात काहीही किंतू-परंतु नाही. महायुतीतील तीन पक्षात समन्वय आहे. उद्या विधानमंडळ पक्षाची मिटींग आहे. त्यात मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे. त्यात चिंतेचे कारण नाही. पाच तारखेला शपथविधी आहे. सर्व काही ठीक होईल असेही ते म्हणाले.
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील का यावर एकनाथ शिंदे यांनी चर्चा सुरु आहे असे उत्तर दिले तसेच श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये श्रीकांत शिंदे यांचे नाव आहे हे दिसून येते.












Click it and Unblock the Notifications