राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचे नाना पटोलेंकडून समर्थन, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीपासूनच संविधान, संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वावडे राहिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस पक्षाने दोन वेळा पराभूत केले. त्यांना अपमानास्पदरित्या राजीनामा देण्यासाठी भाग पाडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात्मक तरतुदीचा संपूर्ण अवलंब काँग्रेसने कधीही होऊ दिला नाही.
काँग्रेसच्या कार्यकाळातच भारतात दोन संविधान कार्यरत होते. म्हणजे कश्मीरसाठी वेगळे संविधान आणि उर्वरित भारतासाठी वेगळे संविधान लागू करण्यात आले होते. काँग्रेसच्या धुरिणांनी कधीही संपूर्ण भारतात एकच संविधान लागू होऊ दिलेले नाही. काँग्रेसच्या कार्यकाळातच दलितांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या. संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विषय काँग्रेस नेहमी फक्त निवडणुकीपुरते वापरत आली आहे. संविधानाचा गजर करून आणि वेळ पडल्यास संविधान धोक्यात आल्याचा नारा देऊ काँग्रेसने वेळोवेळी सत्ता मिळविली, परंतु संविधानाचा आदर काँग्रेसने कधीही केलेला नाही.

संविधान आणि दलितांपेक्षा काँग्रेसला मुस्लिम समाज जास्त प्रिय राहिलेला आहे. म्हणूनच भारतातील स्त्रोतांवर मुस्लिम समाजाचा पहिला अधिकार आहे असे विधान काँग्रेसच्या एका सर्वोच्च नेत्याने केले होते. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतातील साधन संपत्तीचे समान वितरण करायला हवे,असे विधान काँग्रेसचे विदेशातील नेते सॅम पित्रोदा यांनी केले होते. या विधानावरून गदारोळ उडताच त्यांची उचलबांगडी करण्यात आली. पण प्रकरण थंडावल्यानंतर त्यांना पुन्हा पदावर घेण्यात येईल अशी शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती आणि ती खरी ठरली.पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी नेहमीच बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून येते. आता त्यांचीच री लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि त्यांना मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी घेत असल्याचे दिसून येत आले आहे.
लोकसभा निवडणुकीत संविधान बचावचा नारा
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागांसह सत्तेत आली तर संविधान बदलण्यात येईल आणि आरक्षण हटविण्यात येत असा खोटा नारा काँग्रेसने दिला. ही अफवा इतकी नियोजन पद्धतीने पसरविण्यात आली की ती खरी वाटू लागली. याच नाऱ्यावर काँग्रेसला भरभरून मतदान झाले पण तरीही काँग्रेसचा घोडा 99 जागांवर अडला आणि भारतीय जनता पक्ष 240 जागा घेऊन केंद्रात पुन्हा सत्ताधारी झाला.
राहुल गांधी यांची भूमिका
निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा विदेश दौरा झाला. या दौऱ्या दरम्यान काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण संपुष्टात आणण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. दुर्दैवाने राहुल गांधी यांच्या प्रेमात पडलेल्या भारतीय माध्यमांनी त्याचा फारसा गाजावाजा केला नाही. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्याच्यावर थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली नाही.
लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे कॉंग्रेसला अतिआत्मविश्वास
सध्या झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांतही मतदानाचा कल राहील आणि अल्पसंख्याक समाजाच्या मतदानावर आपण निवडून येऊन या भ्रमात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मशगुल आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एका हिंदी वृत्तवाहिनीने नुकतीच मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.
पटोले म्हणतात, राहुल गांधी यांची भूमिका योग्य
आरक्षण संपवणार हे राहुल गांधी यांचे विधान काहीही चुकीचे नाही. त्यात वावगे काहीही नाही असे विधान नाना पटोले यांनी केले. देशात लागू असलेले आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा स्पष्ट इरादा असल्याचे नाना पटोले यांनीही स्पष्ट केले आहे. भाजपने विक्रमी बहुमत असतानाही बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण कायम ठेवले. त्यावर कडी म्हणजे नॉन क्रिमी लेयर ची मर्यादाही भाजपने उठवली. वंचित वर्गाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी घेतली आहे. उलट पक्षी संविधानाने दिलेले आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि त्यांना मानणारे छोट्या छोट्या राज्यातील नेते घेत आहेत.
हा अधिकार दिला कुणी ?
काँग्रेस सरकारच्या काळात दलितांवर सर्वाधिक अत्याचार झाले. राहुल गांधी यांची भूमिका पाहता आणि नाना पटोले यांनी त्या भूमिकेला दिलेले समर्थन लक्षात घेता काँग्रेस चुकून सत्तेत आली तर एससी एसटी ओबीसी अशा सर्व समाजांचे आरक्षण रद्द केल्याशिवाय राहणार नाही,असेच संकेत या भूमिकेतून स्पष्ट होत आहेत. आरक्षण हे आर्थिक नाही तर ते सामाजिक आहे अशी भूमिका संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती. मात्र त्या भूमिकेचा गळा घोटण्याचा प्रयत्न काँग्रेस कडून केला जात आहे.
संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांना आरक्षण दिले. ते आरक्षण काढून घेण्याचा किंवा तशी भूमिका घेण्याचा अधिकार काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना कोणी दिला, असा असावा आता भाजपच्या नेत्यांकडून विचारला जात आहे.
संतापाची भावना
काँग्रेसची बहुजन विरोधी आणि आरक्षण विरोधी भूमिका वेळोवेळी स्पष्ट झाली आहे.आता राहुल गांधी तसेच नाना पटोले यांनीही भूमिका पुन्हा एकदा उद्धृत केली आहे.एससी एसटी ओबीसी या समाजात या भूमिकेमुळे संतापाची भावना निर्माण झाली आहे. आरक्षण विरोधी काँग्रेसच्या भूमिकेचा येत्या निवडणुकीत समाचार घेण्याचा इशाराही या वंचित वर्गातून दिला जात आहे.












Click it and Unblock the Notifications