जालन्यात महायुतीमध्ये बंडाळीची शक्यता, उमेदवारीसाठी चुरस! MVAकडून कैलास गोरंट्याल प्रबळ दावेदार
Maharashtra Assembly Election 2024 : मागील दीड वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे जालन्याकडे कायम लक्ष राहिले. मनोज जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. त्यानंतर लक्ष्मण हाके यांनीसुद्धा जालना जिल्ह्यातच जरांगे यांच्या विरोधात आंदोलन केले. जरांगे यांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला.
विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना लोकसभेच्या जालना मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. आता पक्षाने दानवे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समन्वय समितीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे दानवे यांच्यावर जालन्यासह महाराष्ट्राचीही जबाबदारी आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते राजेश टोपे यांचा हा गृह जिल्हा आहे. त्यांच्यासाठीसुद्धा ही अस्तित्वाची लढाई आहे. पण, जालना विधानसभा मतदारसंघावर महायुतीतील तीनही घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे.

सध्या जालना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल करीत आहेत. महाविकास आघाडीने सिटिंग अॅंड गेटिंग हे सूत्र स्वीकारले तर आमदार गोरंट्याल यांना पुन्हा उमेदवारी मिळेल. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत.
महायुतीत मतदारसंघ कुणाच्या वाट्याला?
जालना विधानसभा मतदार संघात महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अरविंद चव्हाण इच्छुक आहेत. महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) अर्जुन खोतकर यापूर्वी या मतदार संघाचे प्रतिनिधी राहिलेले असून, यावेळेसही त्यांनी तयारी सुरू केली आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनीही या मतदार संघातून संपर्क वाढविलेला असून इच्छुक उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जात आहे. पण, तीन घटक पक्षखपैकी एकालाच या ठिकाणी ही जागा सुटणार आहे. त्यामुळे इतर इच्छुकांकडून बंडखोरी होऊ शकते.
मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या काळात एक महत्त्वाचा घटक बनले आहेत. ते निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, हे सर्व पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जरांगे यांच्या राजकीय भूमिकेवर केवळ जालना मतदारसंघच नाही तर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जरांगे भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करतील का, किंवा ते स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.
पक्षश्रेष्ठींपुढे पेच
महायुतीत अंतर्गत कलहामुळे बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागा वाटपाच्या तिढ्यामुळे स्थानिक नेते आपल्या शक्तिप्रदर्शनात उतरले आहेत, ज्याचा प्रभाव उमेदवारी जाहीर होण्यावर होऊ शकतो. जालना विधानसभा निवडणूक अत्यंत तणावपूर्ण आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
गतवेळी काय झाले होते?
वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा 25 हजार 245 मतांनी पराभव करून जागा जिंकली होती. आता महाविकास आघाडीकडून गोरंट्याल प्रबळ दावेदार आहेत. खोतकर शिंदे गटात असून, निवडणूक तयारीला लागले आहेत.
या आहेत समस्या
जालना शहराहर मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत. पण, जालना एमआयडीसीत मोठे उद्योग नाहीत, उच्च शिक्षणाची सोय नाही, बेरोजगारी, ग्रामीण भागातील रस्ते, पाणी या समस्या आहेत. एमआयडीसीत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. जालना रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या मोठ्या शहरात रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications