दोन महत्त्वाच्या बैठका, झाले दोन महत्त्वाचे निर्णय; काय आहे, महाराष्ट्राच्या सत्तेचं गणित?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं. सत्तास्थापनेसाठी फक्त ४८ तास असल्याने आता सत्तास्थापनेच्या हालचालांना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाची आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्वपूर्ण बैठक सकाळी अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी झाली. सर्व आमदारांनी तेथे हजेरी लावली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

अजित पवारांची गटनेतेपदी निवड
या बैठकीत मोठ्या संख्येने आमदार निवडून आणल्याबद्दल अजित पवारांच्या अभिनंदनचा प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रतोद अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या गटनेता निवडीच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर विधानसभेच्या गटनेतेपदी अजित पवार यांची एकमुखी निवड करण्यात आली. अजित पवारांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा त्यांच्या गटाच्या आमदारांनी शिक्कामोर्तब केले.
काय म्हणाले सुनील तटकरे
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. राज्यात नवीन पर्व उदयास आले आहेत. आजच्या बैठकीत नेता निवडीची प्रक्रिया पार पडली. कालच्या विजयाचा आनंद आम्ही सगळ्यांनी साजरा केला. सत्ता स्थापनेच्या घडामोडी 48 तासात पूर्ण होईल, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
कसे आहे महायुतीचे बलाबल
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर निवडून आले. महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले. त्यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या.












Click it and Unblock the Notifications