बांगलादेशी स्थलांतरिताच्या मनात भूतकाळातील आठवणी ताज्या
भारताचे शेजारी राष्ट्र असलेला बांगलादेश सध्या प्रचंड अस्थिरतेच्या पर्वातून जात आहे. तेथील लोकनियुक्त सरकार उलथून टाकण्यात आले असून हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली आहे. तरीही अस्थिरतेची स्थिती संपलेली नसून दंगे धोपे सुरूच आहेत आणि याचा सर्वाधिक फटका तेथील अल्पसंख्याकांना म्हणजेच पर्यायाने स्थानिक हिंदू बांधवांना बसत आहे.
स्वातंत्र्यापासूनच बांगलादेश मधील राजकीय आणि सामाजिक स्थिती नेहमीच वळणावळणाची राहिलेली आहे. अस्थिरतेच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय स्थितीचा परिणाम लगतचे राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये झालेला दिसून येतो. भारताच्या फाळणीनंतर लाखो लोक लाखो बांगलादेशी नागरिकांनी भारतात आश्रय घेतला. त्यातील बहुसंख्य नागरिक पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा आणि मेघालय येथे स्थिरावले.

आपली आयुष्य नव्याने घडवावीत ही आशा डोळ्यात घेऊन ते भारतात आले मात्र शरणार्थी हा शिक्का कायमचाच त्यांच्यावर बसला. कित्येक दशके उलटल्यानंतर आज बांगलादेश पुन्हा त्याच अस्थिरतेच्या पर्वातून जात आहे आणि तिथल्या अल्पसंख्याक समुदायात असुरक्षिततेची भावना आहे. पश्चिम बंगालमधील हिंदू बांधव बांगलादेश मधील हिंदूंच्या संदर्भात चिंता व्यक्त करीत असून त्यांच्या संरक्षणाची आणि हक्कांची मागणी करीत आहेत.
वेदनादायी भूतकाळाच्या आठवणी
वन इंडियाने अनेक बंगाली हिंदूंशी संवाद साधला. ज्यांनी भूतकाळात अशा स्थितीचा आणि अत्याचारांचा सामना केला आहे, त्यांना बोलते केले. त्या काळात त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा आणि घेतलेले कष्ट ऐकले की अक्षरशः डोळ्यात पाणी येते.
सुशील गंगोपाध्याय हे 1971 साली भारतात आले. बांगलादेशमधील नवखाली जिल्ह्यातल्या त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ते म्हणतात, "आमचे नवखाली जिल्ह्यात खूप मोठे कुटुंब आणि मोठा जमीन जुमला होता. मात्र, बांगलादेशात पाकिस्तानी लष्कर आणि रझाकारांनी आमच्यावर हल्ले केले, आमची घरे जाळली आणि अनेकांची क्रूर हत्या करण्यात आली." या आठवणी सांगताना त्यांचा स्वर कातर झालेला असतो.

सुशील गंगोपाध्याय
बांगलादेश स्वतंत्र्यानंतर तेथील बहुसंख्याक समाजाने केलेल्या अत्याचारामुळे त्यांना भारतात शरणागती पत्करावी लागली. सद्यस्थितीबद्दल बोलताना सुशील म्हणतात "बांगलादेशमध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडी हृदयद्रावक आहेत. एका गरोदर महिलेच्या पोटावर लाथा मारतानाचे दृश्य मी पाहिले. हे सगळे क्रूर आणि अमानवी आहे. एक भारतीय म्हणून मी अशी मागणी करतो की, आमच्या तेथील बांधवांची तिथून मुक्तता करावी. हिंदू बांधवावरील हे अत्याचार असेच सुरू राहिले, तर आपल्याला एक चळवळ सुरू करावी लागेल"
1971 च्या आपल्या आठवणी सांगताना गंगोपाध्याय म्हणतात, "तेव्हा मी दहा ते बारा वर्षांचा होतो. रझाकारांनी आमचा खूप छळ केला. ते पुरुषांचे मृतदेह नद्यात फेकून द्यायचे आणि महिलांना त्रास द्यायचे. त्यांच्यावर अत्याचार करायचे. अनेक महिलांना पाकिस्तानी लष्कराने उचलून नेले. इतकी वर्ष झाल्यानंतरही त्या आठवणी आजही ताज्या आहेत आणि व्रण कायम आहेत."
आणखी एक स्थलांतरित अनिमा दास. या भंगावला राहतात. बांगलादेश सोडला तेव्हा त्या गरोदर होत्या. त्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, "माझा मुलगा लहान होता आणि माझी मुलगी पोटात होती. देशात अराजकाची स्थिती निर्माण झाली. घरेदारे जाळण्यात आली. भीतीने माझ्या सासऱ्यांनी मला भारतात पाठवून दिले." सर्वत्र चाललेला क्रूर हिंसाचार, पुरुषांचे नृशंस हत्याकांड पाहून त्या व्यतित झाल्या होत्या. "त्यानंतर मी काही वेळा बांगलादेशात गेले. मात्र तिथे राहण्याचा विचार सुद्धा मला करवत नाही" असे त्या म्हणतात. सीमेवरील असंख्य नागरिकांचेही असेच म्हणणे आहे.

अनिमा दास
धार्मिक छळवणुकीमुळे अनेकांनी बांगलादेश सोडला. आपली पिढीजात घरे आणि आठवणी तिथेच सोडून ते परत आले आहेत. परांगदा व्हावे लागले याची वेदना आणि सल त्यांच्या मनात आहे. मात्र भारताने संरक्षण दिल्याची कृतज्ञता ही आहे. बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंना त्यांचा एकच सल्ला आहे, "भारतात शरणागती पत्करा!".
वन इंडियाशी बोलताना आराधन बिस्वास, ज्यांचे वडील बांगलादेशातून स्थलांतरित झाले आहेत ते म्हणतात, "अत्याचाराच्या क्रूर मानसिकतेमुळे तेथील संप्रदाय नेहमीच भीतीच्या भावनेत असतो. त्यामुळे अनेकांना आपली जन्मभूमी सोडून भारतात शरणागती पत्करावी लागते. इतिहास काळापासून बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत आले आहेत. स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्य युद्धापर्यंत आणि त्यानंतरही या स्थितीत काहीही बदल झालेला नाही. तरीही काही जणांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र ते आजही दहशतीचा सामना करीत आहेत"
परेश दास 1956 साली भारतात आले. आपला अनुभव कथन करताना ते म्हणतात, "माझ्या आजोबांची माझ्या डोळ्यांसमोर हत्या करण्यात आली. भीतीमुळे आम्ही आमची मालमत्ता तिथेच सोडून पलायन केले. त्यांनी माझ्या चुलत भावावर माझ्यासमोरच हल्ला केला. आता आम्ही शांततेने भारतात राहत आहोत. मात्र आमचे नवखाली येथील नातेवाईक अजूनही भीतीचा सामना करत आहेत. एक महिन्यापूर्वीच माझ्या चुलत्यांची जमिनीच्या वादावरून हत्या करण्यात आली. आम्ही त्यांना सांगितले की मालमत्तेपेक्षा जीव महत्त्वाचा असतो."

परेश दास
हस्तक्षेपाची विनंती
रसामयी विश्वास न्यू टाऊन जवळ राहतात. ते 1971 च्या आठवणी सांगतात. ते म्हणतात, "हिंदू असणं हा गुन्हा होता. स्वातंत्र्यानंतरही कोणताही दिलासा मिळत नव्हता. पाकिस्तानी लष्कर आणि जमात आम्हाला लक्ष करायचे. हिंदू घरावर हल्ले करायचे" ते म्हणतात, "माझ्या कुटुंबाने रात्री रात्री लपून-छपून उपाशीपोटी दिवस काढले आहेत.

राशोमॉय बिस्वास
आता आम्ही भारतात शांततेने राहतो. आमचे अनेक नातेवाईक बांगलादेशात राहतात. आम्ही भारत सरकारला हस्तक्षेपाची विनंती करतो आणि तेथील हिंदूंना भयमुक्त वातावरणात जगता यावे अशी परिस्थिती निर्माण करण्याची विनंती करतो"












Click it and Unblock the Notifications