माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी का घेतली निवडणुकीतून माघार; भाजपने काय आखला होता प्लॅन!
Former Home Minister Anil Deshmukh withdrew from the election :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नुकतीच चौथी उमेदवारी यादी जाहीर केली. यात काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळालं. तर पक्षाच्या वतीने त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. माजी गृहमंत्री आणि शरद पवारांचे विश्वासू अनिल देशमुखांनी या मतदारसंघातून का माघार घेतली, याची चर्चा रंगली आहे. त्याचे कारण देखील आता समोर आले आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
भाजपा सरकार तीन वर्षापासून माझ्या मागे लागलंय, तरी त्यांच्या बापाला मी घाबरत नाही, असे म्हणत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकांसाठी यंदा मुलगा सलीलला मैदानात उतरवत असल्याची माहिती आहे. मी काटोलमधून उमेदवारी फॉर्म भरला नाही, कारण सत्ताधाऱ्यांनी नियोजन केलं होतं की अनिल देशमुख यांनी फॉर्म भरला, तर काही तरी तांत्रिक अडचणी काढायची आणि तो फॉर्म रद्द करायचा. त्यासाठी दिल्लीतून मोठे वकील आणून ठेवले आहेत, जे रश्मी बर्वेसोबत झालं, तसंच माझ्यासोबत करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

म्हणून मुलाला मैदानात उतरवलं
अनिल देशमुख म्हणाले की, मी यंदा निवडणुकीसाठी पुन्हा उभा राहिलो असतो तर पूर्ण नवीन केसेस लावल्या असत्या. त्यामुळे मी उभं न राहता सलीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. सलीलने मला आग्रह करत उभे राहण्यास म्हंटले होते. मात्र, मी त्याला समजावून सांगितले आणि तो तयार झाला. मी जरी उभा नसलो, तरी भविष्यात सरकार महाविकास आघाडीचंच येणार आहे. त्यानंतर शरद पवार साहेब मला पहिल्यांदा विधान परिषदेचा आमदार बनवतील, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
मी लोकांच्या विकासासाठी बांधिल
सलील देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीला पक्षाच्या श्रेष्ठींनी मला संधी दिली. कोविड काळामध्ये मी सातत्याने घरी न बसता मतदारसंघात काम केले. अनिल देशमुख मंत्री असताना मी मतदार संघातील काम सांभाळत होतो. वडिलांना तुरुंगात टाकल्यानंतर मतदार संघातील नागपूर ते मुंबई पाठपुरावा करत होतो. मी लोकांचे काम करण्यासाठी कायम बांधिल राहिल.
अनिल देशमुखांचे लवकरच पुस्तक
अनिल देशमुख यांनी अनुभवाधारित लिहिलेल्या पुस्तकाची देखील माहिती दिली. माझ्यावर कसे खोटे आरोप लावून फसवण्यात आले, कसे 14 महिने तुरुंगात ठेवले, या सर्व बाबी संदर्भात सर्व काही पुस्तकात लिहिल्याची माहिती दिली. तसेच, पुढील दोन तीन दिवसात ते पुस्तक बाजारात येईल, असेही त्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications