Maharashtra Weather Update : परतीचा पाऊस सुरुच, राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढलं आहे. सोमवारी परतीच्या पावसाने मुंबई शहर, मुंबई उपनगर,ठाणे, पालघर आणि नवी मुंबई आणि पुणे, सांगली धुळे जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचे उटके बसत असल्याने उकाडा वाढला आहे.
आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पालघर,ठाणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तर मराठवाडा आणि आणि विदर्भातील बीड, लातूर ,धाराशिव, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, पुणे या जिल्हात मागील दोन दिवसापासून मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. तर आज ही या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरीत महाराष्ट्रात काही ठिकाणी अगदी तुरळक पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान परतीच्या पावसाने शेतक-यांच्या सोयाबीन पीकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक वेगळीच चिंता आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ नुकसान होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात रब्बी पिकाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. तरी शेतक-यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications