शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन आयोजित ‘शिवसेना जनतेच्या दारी' अभियानाला उदंड प्रतिसाद
सामान्यांच्या शासकीय कामांतील अडचणी दूर करून प्रशासकीय सेवा थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशनच्यावतीने आयोजित 'शिवसेना जनतेच्या दारी' या विशेष अभियानाने संपूर्ण मुंबईत जनसेवेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जून महिन्यातील प्रत्येक रविवारी एकामागून एक मतदारसंघांमध्ये या मोहिमेचा धडाका पाहायला मिळाला असून, आतापर्यंत एकूण २५,००० हून अधिक नागरिकांनी या नोंदणी अभियानाचा थेट लाभ घेतला आहे.

या विशेष महाअभियानाची सुरुवात ७ जून रोजी दिंडोशी आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून झाली. त्यानंतर १४ जून रोजी अंधेरी पूर्व व जोगेश्वरी पूर्व, २१ जून रोजी वर्सोवा व अंधेरी पश्चिम आणि २८ जून रोजी मालाड पश्चिम व कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात हे महाशिबीर अत्यंत उत्साहात पार पडले. या प्रत्येक शिबिराला मुंबईकरांनी अभूतपूर्व आणि उदंड प्रतिसाद दिला.
या महाशिबिरामध्ये नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे आयुष्मान भारत कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, स्मार्ट रेशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, रहिवासी दाखला, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती, आणि वास्तव्याचा दाखला या सर्व सेवा एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व कागदपत्रांची पडताळणी आणि नोंदणी प्रक्रिया एकाच छताखाली पूर्ण झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांची मोठी सोय झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (म.प्र.नि.) मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव व संपर्क नेते श्री. सिद्धेश कदम यांनी प्रत्येक रविवारी या शिबिरांना प्रत्यक्ष भेटी देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि नागरिकांशी थेट संवाद साधला.

सुट्टीचा वार बनवला 'सेवेचा वार'; सुट्टी न घेता शिवसैनिक जनसेवेसाठी मैदानात
या उपक्रमाबाबत बोलताना श्री. सिद्धेश कदम म्हणाले, "हा उपक्रम केवळ उत्तर-पश्चिम लोकसभा किंवा उत्तर मुंबईपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण मुंबईत राबवला जाणार आहे. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेबांची जनसेवेची शिकवण आणि त्यांची गतिमान कार्यपद्धती आम्हाला नेहमी प्रेरणा देते. समाजातील शेवटच्या तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व सेवा आणि योजना पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे."
रविवार हा सर्वसाधारणपणे सुट्टीचा आणि आरामाचा दिवस असतो, परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या शिवसैनिकांनी एकही सुट्टी न घेता, प्रत्येक रविवारी स्वतःला या कार्यात पूर्णपणे झोकून दिले.
शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रत्येक शिबिराचे चोख नियोजन केले. सर्व स्वयंसेवकांनी नागरिकांना अर्ज भरण्यापासून ते कागदपत्रे जोडण्यापर्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. "इथून पुढे सुद्धा प्रत्येक रविवारी शिवसैनिक मुंबईकरांच्या जनसेवेसाठी असाच कटिबद्ध राहील," असा ठाम विश्वास याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications